भारतीय स्वातंत्र्यलढ्याबद्दल लिहिताना अंगावर शहारे विचारांना धार आणि लेखणीला वेग आपोआपच येतो. एकेकाळी आपल्या भारतभूला सोने की चिडिया म्हटलं जायचं.
अशा या परम पवित्र भारतभूमीला गोऱ्यांनी बेचिराख करून टाकलं होतं जनसामान्यांचा हक्क हिरावून घेऊन गुलामगिरी लादली होती सारेजण ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीत गुदमरुन गेले होते यामुळेच कधी एकदा आपण या ब्रिटिशांच्या साखळदंडातुन मुक्त होऊ याची प्रत्येकजण चातकासारखी वाट पाहत होता आणि यातूनच भारत मातेच्या कुशीतून एक एक नर रत्ने जन्माला येऊ लागली, जसे की टिळक,सावरकर,भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि असे अनेक अनामवीर.
'अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात'
आज मी तुम्हाला कहाणी सांगणार आहे अशाच एका अनामवीराची.
कहाणी नरसिंह वामन जोशी यांची.
श्री.नरसिंह वामन जोशी म्हणजे माझे पणजोबा. कर्नाटकातील खडकलाट या छोट्याशा खेडेगावातला त्यांचा जन्म. परिसरातले सारे जण त्यांना नरसोपंत याच नावाने ओळखत. खेडेगावात शेती करणारे ते आधुनिक विचारांचे शेतकरी होते. महात्मा गांधीजींच्या विचारांचा त्यांच्या मनावर प्रचंड पगडा होता.
शेती करणे,जैविक खतांचा वापर करणे,शेतीला पोषक पिके घेणे, विहिरीतील जलसाठा वाढवणे यासारखी लोकोपयोगी कामे चालू होती. गावात शाळा,बालवाडी,चरखा आश्रम चालवणे,सूत कातणे अशा अनेक बाबी ते लोकांसाठी करत. गरीब होतकरू मुलांना मदतीचा आधारवड म्हणजे माझे पणजोबा. अशी नरसोपंतांची ओळख बनलेली.
याच दरम्यान स्वातंत्र्य चळवळ पेटत चालली होती. सारा देश गांधीजींच्या पाठीशी ठामपणे उभा होता. अशा वेळी नरसोपंत आणि त्यांच्या पत्नी सौ.जानकीबाई यांनी ठरवले,आपण या गोऱ्यांच्या विरोधात गांधीजींचे हात बळकट करायचे.नरसोपंत निघाले. तेव्हापासून गांधीजींसोबत सरोजिनी नायडू आणि इतरांसोबतच नरसोपंत कायम असायचे. संपूर्ण भारतभर पदभ्रमण केले. जनतेत ब्रिटिशांविरुद्ध असंतोष निर्माण केला. वेळप्रसंगी भूमिगत राहून कार्य करावं लागलं आणि इकडे सौ.जानकीबाई म्हणजे माझी पणजीआजी ही देखील मागे नव्हती. भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांना मदत करणे. त्यांना धान्य-धुन्याची मदत. वेळप्रसंगी जेवू खाऊ घालणं. लढ्यासाठी पैशांची कमतरता जाणवू लागल्यावर मागचा-पुढचा कोणताही विचार न करता स्वतःचे स्त्रीधन लढ्या साठी अर्पण केलं.
दरम्यान गांधीजींनी आचार्य विनोबा भावे यांची वैयक्तिक सत्याग्रही म्हणून निवड केली आणि भूदान चळवळ सुरू झाली. नरसोपंतांची वडिलोपार्जित भरपूर जमीन होती. उदरनिर्वाहासाठी आवश्यक तितकी जमीन ठेवून उरलेली जमीन विनोबांच्या भूदान चळवळीत दान केली. अनेकदा कारावासाची शिक्षा देखील भोगावी लागली. साऱ्यांच्या प्रयत्नांमुळे भारत स्वतंत्र झाला. तिरंगा फडकला.परकीय सत्तेला मुळापासून उखडून टाकण्याची नरसोपंतांची मनो कामना पूर्ण झाली. भारत सरकारने त्यांचा गौरव केला.
१९५६ साली भाषावार प्रांत रचना सुरू झाली. आणि निपाणी बेळगाव कारवार असा मोठा भूभाग कानडी मुलखाचा जोडला गेला. नेहरू सरकार विरुद्ध फार मोठे जनआंदोलन उभे राहिले. ठीकठिकाणी जाळपोळ सुरू झाली. सरकार खादी टोपीधारकांचे होते. त्यामुळे गांधी टोपीवाला दिसताच, डोक्यावरील टोपी काढून घेउन लोक टोपी होळीत टाकत होते. नरसोपंत खादी कपडे, खादीची शबनम बॅग आणि डोक्यावर खादीची गांधी टोपी याशिवाय दुसरा कपडा वापरत नसत. जमावातील एकजण त्यांच्याकडे गेला आणि टोपी काढून घेऊ लागला नरसोपंत म्हणाले,"मी गांधी टोपी देणार नाही वाटले,तर मला टोपीसह जाळून टाका.पण गांधीटोपी सोडणार नाही." अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. चिडलेल्या तिघा-चौघांनी नरसोपंतांना उचलले आणि होळी टाकायला घेऊन जाऊ लागले. 'जय हिंद!' 'जय खादी!' 'जय गांधीजी!' अशा घोषणा ते देऊ लागले. त्यांचा तो जोश बघून उचलून घेऊन जाणारे घाबरले आणि नरसोपंतांना सोडून दिले. परंतु जनमनाचा मान राखून त्यांनी डोक्यावरील खादीची गांधी टोपी काढून खिशात ठेवली आणि 'भारत माता की जय!' घोषणा देत निघून गेले. त्यानंतर परत मृत्यूपर्यंत कधीही त्यांनी त्यांची लाडकी खादीची टोपी डोक्यावर घातली नाही.
पुढील सगळे जीवन लोकचळवळ,शैक्षणिक कार्य, समाजरचनेत घालवले. खडकलाट येथील आपला राहता वाडा शाळेसाठी विनामूल्य अर्पण केला.नरसोपंतांनी जीवनाचे अंतिम क्षण हरी मंदिरात, हरिनामात व हरिनामातून मंगल कामे करायची ताकद मिळते.' हा संदेश देत घालवले. शतायुषी नरसोपंतांचे देहावसान झाले. नातीने आजोबांची खिशातली गांधीटोपी नरसोपंतांच्या डोक्यावर घातली. कुंकुमतिलकाने आरती केली आणि खादी टोपी देवघरात ठेवून पूजा केली.
अशा हजारो अनाम वीरा यांसाठी म्हणावेसे वाटते.
स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात.
काळोखातूनी विजयाचा हे ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा.'
धन्यवाद
लेखन- आयुष मल्हारी कुलकर्णी
सहाय्य- श्री.प्रकाश नरेंद्र देशपांडे (प्रसिद्ध लेखक तथा महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक)
श्री.अरविंद नरेंद्र देशपांडे ( संस्थापक अध्यक्ष नरेंद्र विद्यापीठ, कोल्हापूर)
सौ.मीरा सुनील करगुप्पीकर (श्री.नरसिंह वामन जोशी यांची नात)










